...केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे ते अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेले हे कौर्य नाही. किंबहुना, त्या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही त्या समाजाला नाही. केवळ, जिवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष कौर्याला असला तर आहे आणि ही त्या समाजाची खरी शोकांतिका आहे.